गोंदिया जिल्ह्याच्या प्रशासकीय वर्तुळात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ घडली आहे. जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावलेंची बदली झाली आहे.
IAS Transfer : कोणतेही पद मिळाल्यानंतर नागरिकांची कामं न करणं आमदार डॉ. परिणय फुके यांच्या पचनी पडत नाही. गेल्या काही महिन्यांपूर्वी नागरिकांची कामं न ऐकणाऱ्या एका जिल्हाधिकाऱ्याची व पोलिस अधीक्षकाची बदली आमदार डॉ. फुके यांनी करून आणली होती. त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आता झाली आहे. गोंदियाचे जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांची आमदार फुके यांनी बदली करून घेतली आहे.
एप्रिल महिन्यात डॉ. गोंदावले यांची गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र डॉ. गोंदावले यांनी मनमानी पद्धतीने प्रशासकीय गाडा हाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात आहे. हा प्रकार आमदार डॉ. परिणय फुके यांना आवडला नाही. त्यामुळे डॉक्टर असलेल्या फुके यांनी डॉक्टर असलेल्या जिल्हाधिकाऱ्यांना समजदारीने घेण्याचा सल्ला दिला.
परफेक्ट औषध
आमदार फुके वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टर नसले तरी राजकीय औषधोपचार करून कोणता आजार बरा करायचा याचे ज्ञान त्यांना पुरेपूर आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांना ‘जरा दमानं घ्या’, अशा औषधगोळ्या देण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रशासकीय ताळमेळ न बसल्याने अखेर आमदार डॉ. फुके यांनी बदलीचे ‘परफेक्ट प्रिस्क्रिप्शन’ डॉक्टर कलेक्टर यांच्या हाती दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
डॉ. गोंदावले आता गोंदियातून थेट छत्रपती संभाजीनगरात जातील. त्यांना सिडकोचे मुख्य प्रशासक करण्यात आले आहे. मुख्य प्रशासकीय प्रवाहापासून दूर असलेली ही ‘साइड पोस्टिंग’ आहे. त्यांच्या जागेवर मंदार पत्की हे नवे जिल्हाधिकारी आले आहेत. युपीएससीच्या परीक्षेत त्यांना अखिल भारतीयस्तरावर 22वा क्रमांक मिळवला होता. यवतमाळ जिल्हा परिषदेत पत्की मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त होते. आता त्यांना गोंदियाची धुरा सोपविण्यात आली आहे.
समन्वय राहणार
भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विकास कामांबाबत आमदार डॉ. परिणय फुके हे नेहमीच आग्रही असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील त्यांचा शब्द टाळत नाहीत. अशात परिस्थितीत आमदार फुके यांनी विनाकारण कोणत्याही अधिकाऱ्याचा छळ केला असे ऐकिवात नाही. मात्र प्रशसकीय चौकटीच्या बाहेर जाऊन नागरिकांची कामं न करणारे अधिकारी भंडारा, गोंदियात चालत नाही, हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे. त्यामुळे नव्या जिल्हाधिकाऱ्यांनाही समन्वयाने काम करावे लागणार आहे, हे निश्चित. यात पत्की यशस्वी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
